माझा नाट्यानुभव

'दो बजनिये'
जयंत करंडक
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
***
दिवस पहिला
***
प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेली आणि आर. आय. टी., इस्लामपूर यांनी सादर केलेली ही एकांकिका.
अगदी 'दीपा मेहतां'च्या 'अर्थ' पासून 'विजय राझ'च्या 'क्या दिल्ली, क्या लाहोर' पर्यंत मोठ्या पडद्यावर अनेकवेळा हाताळलेल्या 'भारत-पाकिस्तान फाळणी' या विषयावर आधारित. लेखक आणि दिग्दर्शकांना नेहमीच या विषयाबद्दल औत्सुक्य वाटत आलं आहे. पण प्रत्येक वेळी या दाहक विषयाच्या एक-एक अंधाऱ्या कोपऱ्यावर प्रकाश टाकण्यात लेखक यशस्वी होतोच असं नाही. पण इथे मात्र लेखक हमखास यशस्वी झाला आहे आणि पर्ययाने एकांकिका सुद्धा.

ही कथा आहे स्वातंत्र्यपूर्व लाहोर मधील दोन वाजंत्र्यांची. लग्नाच्या वरातीत बँड वाजवणारे 'सिराज' आणि 'ताज' हे दोघे अविवाहित मित्र. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीमुळे यांच्या आयुष्यात होणारे बदल, मैत्रीच्या नात्यांमधील तणाव, तत्कालीन राजकीय डावपेच आणि एक उपकथानक हे सगळं जरी अगदी प्राथमिक स्वरूपाचं असलं तरी ते एका मोठ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करत आहेत हे सारखं जाणवत राहतं.
एकांकिकेतील संवाद फारचं तगडे आहेत. आणि या संवादाच्या जोरावर एकांकिका निम्मी बाजी मारून जाते. सुरवातीला असणाऱ्या खुसखुशीत संवादांवर वेळ पुढे सरकत जाईल तशी गडद छटा येऊ लागते. आणि 'त्या' परिस्थितीची जाणीव, दहशत प्रेक्षकाला असह्य करून टाकते.
लेखनामध्ये सक्षम असणारी एकांकिका दिग्दर्शन, अभिनय आणि इतर सर्वचं तांत्रिक बाबींमध्ये सुद्धा फ्रंट फूट वर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ उभा करण्यात ध्वनी संयोजनाचा मोठया खुबीने वापर केला आहे. रेडिओवर ऐकू येणाऱ्या बातम्या, मोर्चांचे, घोषणांचेे आवाज आणि आपल्या समोर, प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडणारं नाट्य सहजचं, अगदी नकळत टाइम ट्रॅव्हलर प्रमाणे आपल्याला त्या काळात घेऊन जाते.
एकांकिका, नाटक हे माध्यम खरं म्हणजे लेखकाचं. पण इथे लेखकाने लिहिलेल्या प्रसंगांमध्ये जान आणण्याचं खरं काम केलं आहे ते दिग्दर्शकानं आणि त्याच्या खांद्याला खांदा लावूनचं अभिनेत्यांनी. सापशिडीचा डाव, अविवाहित ताजचं लग्नामध्ये नटण्याचं स्वप्न, ताज-सिराज मधील दिल्ली- लाहोर चे संवाद, क्लायमॅक्सचा प्रसंग खूपचं सुंदर जमले आहेत आणि अजूनही डोळ्यांसमोर तरळत आहेत. अर्थात वर नमूद केल्याप्रमाणे उपकथानकाचा (दंगलीचा वैयक्तिक स्वार्थापोटी आणि धर्माच्या नावाखाली फायदा उठवणारे) एक प्रसंग अति भीषण झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे नाटक त्याच्या मूळ कथानकापासून भरकटत आहे की काय असा प्रश्न प्रेक्षकांच्या (निदान माझ्यातरी) मनात अगदी काहीचं काळ का होईना पण येऊन जातो.

एकूणच काय तर...
दो बजनिये ही प्रचंड इम्पॅक्ट असणारी, जवळपास सर्वचं बाबींमध्ये आघाडीवर असणारी, बराच काळ सोबत राहणारी, ताकदीची एकांकिका आहे.
***
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'दरिया'
जयंत करंडक
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
***
दिवस दुसरा
***
इरफान मुजावर यांनी लिहिलेली आणि श्री भगवती क्रियेशन्स, सांगली यांनी सादर केलेली ही एकांकिका.
ही कथा आहे इराक मधील धुमसत्या पर्वाची. इराकमधील दहशतवाद, अतिरेकी संघटनांचा होणारा उदय आणि या अमानवी प्रवृत्तीला खतपाणी घालणारा स्त्रियांची दलाली हा गैरव्यवसाय या साऱ्यावर ही एकांकिका असं काही भाष्य करते की सुन्न झालेला प्रेक्षक असा मनाच्या खोल तळाशी हेलावून जातो.

या अतिदाहक, भीषण वास्तवावर भाष्य करण्यासाठी लेखकाने उभी केलेली तीन स्त्री पात्रं पुरेशी असतात. नादिया, अमाल आणि रुबा. अमाल ही एक स्त्री. तिची अंध बहिण रुबा. अमाल च्या पतीने
कोठ्यावर बसवलेली नादिया. ह्या पात्रांचे अंतरंग, एकमेकांबद्दल वाटणारी आपुलकी, सभोवतालच्या भीषण आणि तीव्र परिस्थितीबद्दल असणारा त्वेष आणि यामध्ये घडणारं नाट्य केवळ पाहण्यासारखं, अनुभवण्यासारखं आहे.
इरफान मुजावर हे लेखक म्हणजे एक 'अभ्यास' करण्याचा विषय आहे. म्हणजे मी त्यांना वैयक्तिक ओळखत नाही पण त्यांनी लिहिलेल्या एकांकिका आणि त्यातलं वैविध्य हा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसं आहे.
हा अति गडद विषय हाताळताना विशिष्ट प्रकाश संयोजन, आर्थिक दृष्ट्या कोसळलेल्या इराकचं डोळ्यासमोर उभं करणारं नेपथ्य, परिस्थितीला पूरक असा ध्वनी आणि कलाकारांचा वाखाणण्या जोगा अभिनय (खास करून नाजिया तिच्या स्वप्नातील इराकचं वर्णन करताना) हे सर्वचं हातात हात घालून असे काही रंगमंचावर सादरीकरण करतात की बस्स !
फक्त... फक्त एकांकिकेच्या शेवटी येणारा जो ट्विस्ट आहे तो संवादातून उलगडून सांगण्याची काहीच गरज नव्हती (असं माझं मत). प्रेक्षक वर्ग आता सुजाण बनलेला आहे, तो स्वतःच्या वैचारिक क्षमतेनुसार शेवटाचा अर्थबोध करून घेऊ शकतो. या फक्त एकाचं गोष्टीचा विचार जर झाला असता तर त्याचा एक वेगळीच इम्पॅक्ट आणि प्रेक्षकांच्या डोक्यात एक वैचारिक कीडा पेरला गेला असता.

एकूणच काय तर...
'दरिया' इरफान मुजावर यांच्या लेखणीतून उतरलेली काळजात चर्रर् करणारी एकांकिका आहे.
***
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'माईक'
जयंत करंडक
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
***
दिवस तिसरा
***
मल्हार रंगमंच, अहमदनगर यांनी सादर केलेली ही एकांकिका.
साधारणपणे एकांकिकेचे नाव पाहिल्यावर एखादा लेखक कोणता विषय घेऊन येईल याचे आपल्याला ठोकताळे मांडता येतात. पण इथं मात्र ही एकांकिका एकदम सरप्राईज पॅकेज ठरते.
माईक या एकांकिकेमध्ये गोष्ट मांडली आहे ती स्टेज बांधणाऱ्या कामगार मुलांची. आता ही जी मुलं आहेत ती वेगवेगळ्या समाजाचं, विचारांचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यात दोघे हिंदू-मुस्लिम खास मित्र आहेत, एक ख्रिश्चन आहे, एकाचं प्रेम दुसऱ्या जातीतील मुलीशी आहे, एकाला सारखे काही न काही प्रश्न पडत आहेत, चार-एक पावसाळे जास्त पाहिलेला एक फुलंवाला आहे. आणि अजूनही काही पात्रे आहेत.
एकांकिकेमधील कथानकाला दिलेल्या विनोदाच्या खमंग फोडणीमुळे बऱ्याच सामाजिक विषयांना हात घालणारा हा विषय मुळीच उपदेश वाटत नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या स्वभाव वैशिष्ट्यांमधून आणि बोलीभाषेतून खुलणाऱ्या विनोदामुळे मस्त मजेत सुरु असलेला विषय असा काही अचानक गंभीर होऊन जातो आणि लगेचच तो पुन्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू खुलावतो. आणि म्हणूनचं मला वैयक्तिक या एकांकिकेचे लिखाण 'अभिजात जोशी'च्या पॅटर्न सारखं वाटलं.
एकांकिका सुरु झाल्यानंतर संपूर्णपणे रिकामा असणारा रंगमंच एकांकिकेच्या शेवटाकडे जसा येतो तसे हे स्टेज या मुलांनी बांधून तयार केलेलं असतं. असं प्रत्यक्ष आपल्या डोळयांसमोर उभं केलेलं हे नेपथ्य आणि त्याचा कथानकामध्ये केलेला वापर(खास करून 'माईक'चा) कमाल आहे. स्वदेस चित्रपटामधील इंस्ट्रुमेंटल ट्युन्स चा केलेला वापर सुद्धा चपखल आहे.
कामगार मुलांमध्ये असणारे संवाद जरी वरकरणी विनोदी वाटत असले तरी ते बरंच काही सांगून जातात आणि त्यांचं प्रतिबिंब एकांकिकेमध्ये असं काही दिसतं कि प्रेक्षक अवाक होऊन जातो.
एकांकिकेतील नेत्यांची होण्यारी भाषणं, त्यावेळीचं प्रकाश संयोजन आणि होणारी वातावरण निर्मिती केवळ अनुभवण्यासारखी आहे. एकांकितील पात्रांचं प्रेक्षकवर्गाला सामावून केलेलं improvised संभाषण सुद्धा मस्तचं आहे. अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनाचा एन-केन प्रकारे ठाव घेतलेली एकांकिका क्लायमॅक्स मध्ये अशी काही अतुलनीय उंची गाठते की क्या बात ! असं म्हणण्यासाठी सुद्धा प्रेक्षकांकडे शब्द उरलेले नसतात.
या एकांकिकेबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे. पण ही एकांकिका पाहण्यात, अनुभवण्यात जी मजा आहे ती अशी सांगण्यात किंबहुना वाचण्यात देखील नाही.
एकूणच काय तर...
माईक ही एकांकिका याची देही, याची डोळा पाहावा असा वेगळा आणि थक्क करणारा अनुभव आहे. तेंव्हा तुमच्या आसपासच्या परिसरात हि एकांकिका पाहण्याची संधी कोणत्याही, अगदी कोणत्याही परिस्थितीत सोडू नका.
***
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 'दो बजनिये' आणि 'दरिया' ची संहिता जर वाचायची इच्छा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये ई-मेल आय.डी. अथवा व्हॉट्स ऍप क्रमांक द्यावा.

Comments

  1. नाट्यानुभव लिहणं हे सर्वस्वी लेखकाच्या भावलेल्या मनावर असते - सकारात्मक किंवा नकारात्मक. पण तू अगदी मुद्देसुद आणि थोडक्यात balanced लिहल आहेस.
    Keep it up ��
    खरंच याची संहिता वाचायची खूप उत्सुकता लागलीये तर मग...
    Prathamesh.jadhavdir@gmail.com
    पाठव या e-mail id वर नक्की... ��

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts