काबिल: काबिल ए तारीफ !

बॉलिवूड मध्ये चित्रपटांचा clash होणं, चित्रपटातील स्टार मंडळींनी आपलं सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरणं हे काही नवीन नाही. अगदी लगान-गदर पासून आत्ताच्या रुस्तम-मोहेंजो दारो पर्यंत बरीच उदाहरणे देता येतील. आणि यातचं भर म्हणून आता रईस-काबिल या जोडीची भर पडली. २६ जानेवारीच्या सुट्टी आणि ५ दिवसांचा मिळणारा भला मोठा विकेंड डोळ्यासमोर ठेवून हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. सिनेसृष्टीत आणि पर्यायाने सिनेरसिकांत शाहरुखच्या रईस ची हवा गेली एक वर्षभर होती. प्रमोशन सुद्धा तेजीत सुरु होती. त्यामुळे हृतिकचा प्रदर्शित होणारा काबिल तसा अंडरडॉग राहिला. कोणतही प्रेशर नव्हतं. मोहेंजो दारो चा अनुभव गाठीशी असल्यामुळे अपयशाची भीती सुद्धा नव्हती. आणि विदाऊट प्रेशर बॅटिंग चांगली होतीच ना.

चित्रपटाचा प्रोमो अथवा ट्रेलर जेंव्हा प्रदर्शित झाला तेंव्हा सूड कथा असणार हे माहित होतं. पण त्या प्रोमो अथवा ट्रेलर च्या शेवटी दिसणाऱ्या नावामुळे जरा नव्हे जास्तचं शंका वाटत होती. संजय गुप्ता. या चित्रपटाचे दिग्दर्शक. म्हणजे या दिग्दर्शकाची एक ठरलेली पद्धत आहे. कोणताही चित्रपट असो तो एखाद्या पाश्चात्य चित्रपटावरून उचलायचा. भरपूर देसी मसाला टाकायचा. कॅमेऱ्याचे अँगल असे तिरके अथवा कोपऱ्यातून विचित्र पद्धतीने घ्यायचे आणि छायाचित्रण अगदी वेगळंच किंबहुना गडद करून टाकायचं. अगदी कांटे पासून जझबा पर्यंत याला सहसा कोणता अपवाद नाही. आणि नियमाला अपवाद हे हवेतचं म्हणून हा काबिल.
म्हणजे यात दिग्दर्शकीय विचित्र गोष्टी नाहीत. पण मसाला हमखास आहे. आणि त्या मसाल्याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तो परिमाणकाराक आणि सेन्सिबल आहे. त्यामुळे प्रेक्षकाला हा तद्दन मसाला चित्रपट पाहताना कंटाळा येत नाही.
आता ही सुडकथा आहे यातच सगळं आलं. चित्रपटाचा शेवट सुद्धा अपेक्षित आणि गोड आहे. आणि तो हवाच नाही का ? पण या सगळ्यात खरं नाट्य आहे ते म्हणजे इथे नेहमीसारखा १५-२० लोकांना लोळवणारा हिरो नसून तो अंध आहे. अर्थात तो बॉलिवूड चा हिरो असल्यामुळे स्पेशल आहेचं. म्हणजे त्याची ज्ञानेंद्रिय तीक्ष्ण आहेत. तो स्वतः डबिंग आर्टिस्ट आहे आणि अजूनही काही गोष्टी आहेत. आणि या सर्व गोष्टी कथानकात नेमक्या पेरल्या असल्यामुळे मजा येते.
चित्रपटाची मांडणी हि एकदम सरधोपट मार्गाने केली आहे. पूर्वार्धामध्ये पात्रांची ओळख, अंध नायक-नायिकेची प्रेमकथा, मग त्यांच्यावर होणारा अन्याय वगैरे वगैरे. आणि उत्तरार्धामध्ये बदला. पूर्वार्धामध्ये जरी काही वेगळं अथवा विशेष पाहायला मिळत नसलं, अर्थात काही मोजके प्रसंग सोडता तरी उत्तरार्धामध्ये आता पुढे काय होणार, हा अंध नायक काय युक्ती करणार, त्यात त्याला यश येणार का, त्याचा बदला तो कसा घेणार हे पाहण्यातच खरी गंमत आहे.

आता अंध नायक हे सगळं कसं करू शकतो, एवढ्या मोठ्या लोकांवर कशी काय मात करू शकतो, मुंबईचा एवढा मोठा नेता सिक्युरिटी न घेता का फिरतो असे तर्कशुद्ध प्रश्न जर मनात येत असतील तर त्यांचं मात्र प्रामाणिक उत्तर इथं मिळत नाही. पण असे चित्रपट पाहताना असला विचार मनात आणायचा नसतो हे सुद्धा तितकंच खरं. पूर्वार्धामध्ये काही प्रसंग विनाकारण आल्यासारखे वाटतात. म्हणजे कथेशी त्यांचा अर्थाअर्थी काही विशेष संबंध नसतो. त्यामुळे चित्रपट थोडासा रेंगाळतो सुद्धा. उत्तरार्धामध्ये सुद्धा यामी गौतम आणि हृतिक चे प्रसंग उगाच घुसवल्यासारखे वाटतात. मसाला चित्रपटाचा आयटम सॉंग हा अविभाज्य घटक असल्यासारखं ते सुद्धा मध्येच येतं. आणि ते सुद्धा 'सारा जमाना' सारख्या सदाबहार गाण्याची भ्रष्ट नक्कल असल्यामुळे डोक्यात जातं.
तांत्रिक दृष्टया काबिल सरस आहे. सुदीप चॅटर्जी ची सिनेमॅटोग्राफी आणि रेसुल पुकट्टी चे साउंड डिजाईन उठावदार आहे. राजेश रोशन चं संगीत सुद्धा आश्चर्यकारक रीतीने चांगलं आहे. त्यामुळे चित्रपटातील गाणी गुणगुणत राहावी अशीच आहेत. आणि त्यात हृतिकचा सफाईदार डान्स. म्हणजे अंध व्यक्तीने केलेला डान्स याचं भान सांभाळून केलेला असल्याने नेहमीपेक्षा वेगळं फिलिंग येतं. संवाद तर या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे अगदी साधे सोपे ते खटकेबाज अशी सगळी रेंज इथे आहे. आणि शिवाय त्या संवादाना पटकथेत सुद्धा महत्व आहे. चित्रपटाची ऍक्शन सुद्धा विचारपूर्वक आणि सांभाळून केलेली जाणवते. अर्थात ती काही ठिकाणी अति फिल्मी होती म्हणा.

तसा मी वैयक्तिक हृतिक रोशन चा चाहता नाही. पण काबिल पाहिल्यापासून मला त्याचं खूप कौतुक वाटत आहे. रोहन भटनागर साकारताना त्याने घेतलेली मेहनत, अभिनयातील सहजता, त्याचा स्पर्श, त्याच्या बदलत जाणाऱ्या व्यक्तिरेखेचा आलेख, डबीन्ग आर्टिस्ट असल्यामुळे ते काही प्रसंग, सगळीकडे तो कमाल करतो. आणि हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट अभिनय म्हणायला काहीच हरकत नाही.
यामी गौतम सुद्धा त्याला तोलामोलाची साथ देते. या चित्रपटाचे व्हिलन आहेत ते म्हणजे रोनित रॉय आणि त्याचा भाऊ रोहित रॉय. दोघांनी आपलं काम चांगलं केलं आहे. रोनित रॉयचे काम तर त्याचा राग यावा एवढं दमदार केलंं आहे. आता फक्त शेलार हे आडनाव ठेवून मराठी बोलण्याचा घाट का घातला हा प्रश्न सुद्धा उरतोच. गिरीश कुलकर्णी ने आता बॉलिवूड कॉप ला सोडून काहीतरी वेगळं करायला हवं. म्हणजे अगली मध्ये त्याचे संवाद आणि प्रसंग ताकदीचे असल्याने तो जास्त खुलून आला तस इथे होत नाही.
एकूणच काय तर तुम्ही मसाला चित्रपट एन्जॉय करत असाल, तर्कशुद्ध प्रश्न मनात डोकावल्यामुळे तुमचा चित्रपटातील इंटरेस्ट कमी होणार नसेल आणि जर तुम्ही हृतिकचा चाहते असाल तर अथवा नसाल तर ते होण्यासाठी काबिल पाहायला जा.

Comments

Popular Posts