जाऊंद्याना बाळासाहेब
गिरीश-उमेश ही भारतीय चित्रपटसृष्टितील अभिजात द्वयी.
हे दोघे एकत्र आले की मग काहीतरी भन्नाट, अर्भाट कलाकृती जन्माला येणार हे नक्कीच असतं.
वळू, देऊळ, विहीर आणि हायवे या चारही चित्रपटांमधून लेखक-अभिनेता म्हणून गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक म्हणून उमेश कुलकर्णी यांनी जी काही प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे ती विलक्षणचं.
आता गिरीश कुलकर्णी 'दिग्दर्शन' करणार म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नवीन अध्याय लिहिला जाणार हे गृहितच होतं.
उत्सुकताही शिगेला पोहोचली होती. अणि मग आज बाळासाहेबांचं आगमन झालं.
'जाऊंद्याना बाळासाहेब' हा गिरीश कुलकर्णी लिखित, दिग्दर्शित पहिलाच चित्रपट 'डॉल्बीवाल्या' या भन्नाट गाण्याने आणि अतरंगी पाट्या दाखवून प्रेक्षकांचं स्वागत करतो आणि आपल्याला नेहमीसारखच भन्नाट पाहायला मिळणार ही प्रेक्षकांची खात्री होती. पण जसा जसा चित्रपट पुढे सरकत जातो, तसा तसा प्रेक्षकाना आपला अंदाज चुकला😔 याची जाणीव व्हायला सुरुवात होते.
सभोवतालची परिस्थिती, राजकारण, सामाजिक जाणीवा या सर्वावर स्वतःच्या खास शैलीत नर्मविनोदी भाष्य करणारा हा लेखक जाऊंद्याना बाळासाहेब मध्ये कुठे तरी हरवल्यासारखा वाटत राहतो. पहिल्याच प्रयत्नात जे काही सभोवताली चाललेलं आहे ते सगळचं दिग्दर्शकाला सांगायचं आहे की काय असं वाटत राहतं.
पुण्याजवळील गरसोळी या गावातील मोठ्या पुढाऱ्याचे चिरंजीव म्हणजे बाळासाहेब अण्णासाहेब मारणे यांची ही गोष्ट. वडिलांच्या जीवावर, मस्तीमध्ये, मद्यधुंद राहणाऱ्या बाळासाहेबांच्या अंतरंगात अमुलाग्र बदल कसा घडून येतो हे साधं कथानक. मग त्यामध्ये राजकारण, सत्ताकारण, पैसा, सर्वसामान्याच्या मूलभूत गरजा, त्यांचं शोषण, जातीय व्यवस्था, पुण्यातील प्रायोगिक नाटकाची चळवळ इत्यादी इत्यादी विषयांची फोडणी.
वळू आणि देऊळ मधून प्रेक्षकाला हसवत, खेळवत, सामाजिक विषयाला हात घालण्याचा झालेला यशस्वी प्रयत्न इथं दिसून येत नाही. चित्रपटाच्या १५-२० मिनीटानंतरच आपण शाळेत आहोत की काय असं काहीसं वाटायला सुरुवात होते.
अजय-अतुल यांची आलिंगनाला आणि मोना डार्लिंग ही गाणी मुद्दामून पेरल्यासारखी वाटतात.
चित्रपटाचा पूर्वार्ध हा काहीसा बरा वाटतो पण पटकथेतील उणीवांमुळे तो म्हणावा तितका प्रेक्षकांना भिडत नाही.
खुमासदार आणि चटपटीत संवादांची जागा अवजड संवाद हे तितक्या सहजतेने घेत नाहीत.
एवढं सगळं सांगितल्यावर हा चित्रपट का पाहावा असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे.
गिरीश कुलकर्णी यांना जरी लेखक-दिग्दर्शक या आघाड्यांवर चोख कामगिरी बजावता आली नसली तरी ती सगळी उणीव ते अभिनयामध्ये चांगलीच भरून काढतात. राजापासून कवीपर्यंतच्या प्रवासामध्ये ते असे काही सहजतेने रंग भरून जातात ते पाहण्यासारखंच.
किशोर चौगुले, श्रीकांत यादव आणि भाऊ कदम सुद्धा अभिनयात चांगलीच फटकेबाजी करतात. मोहन जोशी, रीमा लागू हे दोघे आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून आवर्जून लक्षात राहील असंच खणखणीत नाणं वाजवतात.
सई ताम्हणकर, सविता प्रभुणे आणि मनवा नाईक ह्या आपापल्या परीने रंग भरतात.
त्याच बरोबर काही विनोदी प्रसंग ही मस्त जमून आले आहेत.
अजय-अतुल यांची डॉल्बीवल्या, गोंधळ आणि वाट दिसू दे ही गाणी चपखल बसतात हे नक्की.
चित्रपटाचा शेवट तर्कशुद्ध नसला तरी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी होतो.
गिरीश-उमेश यांच्या पूर्वीच्या चित्रपटातील विषय आणि आशयाची व्यापकता यामध्ये नाही पण गिरीश कुलकर्णीचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न आणि कलाकारांच्या लाजवाब अभिनयासाठी बाळासाहेबांना एकदा भेट देण्यास काहीच हरकत नाही.
चित्रपट संपल्यावर मात्र चित्रपटातील एक संवाद सारखा सतावत राहतो... लेखक वेगळा आणि दिग्दर्शक वेगळा !
-आशुतोष :)

Comments

Popular Posts