घंटा

'नावात काय ?' असं जरी आपण म्हणत असलो, तरी काही वेळेस ते नावाप्रमाणेचं असते !
'क्राइम कॉमेडी' म्हणलं की आम्हा तरुण पिढीचे डोळे औत्सुक्याने विस्फारतात. आणि काहीतरी धम्माल पाहायला मिळणार असे मनोमन ठरवतात. हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये याची कमतरता नाहीचं. पल्प फिक्शन, द स्टिंग, स्नैच, किस किस बँग बँग, द बिग लॅबोस्की अशी काही इंग्रजी चित्रपटांची आणि दिल्ली बेल्ली, हेरा फेरी, 99, सी कंपनी या हिंदी चित्रपटांची नावे लगेच डोळ्यासमोर समोर येतात.
या प्रकारात मराठी चित्रपट जरा मागेच आहे. पण हा प्रयत्न मराठीत(या आधी 'तेंडुलकर आउट' मध्ये) होतोय म्हणल्यावर उत्सुकता खूपच वाढली होती.
'घंटा' हा चित्रपट सर्वसाधारणपणे दिल्ली बेल्लीच्याच धाटणीचा.
म्हणजे तीन मित्र. तिघांची तीन वेगळी स्वप्नं. भिन्न स्वभाव. पण लवकर पैसे मिळवण्याची हाव. त्यांच्या हाती मग काहीतरी किमती वस्तू लागते(इथेही हिरेचं) आणि मग सुरु होते ती अखंड धावपळ, पाठलाग... असं काहीसं घंटाचं ही तेच कथानक. फक्त यामध्ये डार्क कॉमेडीला बगल देऊन कथेची मांडणी केली आहे एवढेच.
चित्रपटाची सुरुवात झाल्यावर, जवळपास अर्धा-पाऊण तास भरमसाठ पात्रांची ओळख करण्यातचं जातो. इतर पात्रांचीच गर्दी झाल्याने प्रमुख तिघा मित्रांच्या पात्र आणि स्वभाव वैशिष्ट्ये रंगवण्याकडे काहीसं दुर्लक्ष होतं.
सुमित बोणकर, राहुल यशोद यांची पटकथाही काहीशी ढिसाळ आहे. अशा चित्रपटांमध्ये जशी प्रमुख पात्रांची अक्षरशः फाटायला(!) पाहिजे, तंतरली पाहिजे तशी परिस्थितीचं इथे निर्माण होत नाही.
क्राइम कॉमेडी मध्ये संवाद फार महत्वाचा वाटा उचलतात. चटपटीत आणि खणखणीत वाजणारे संवाद असले तर काही वेगळीच मजा येते. इथे ती ही बाजू 'म्हणावी तशी' जमलेली नाही.
हे सगळं जरी असलं तरी, यामध्ये CGI आणि Animation चा कित्येक दिवसाने(अथवा पहिल्यांदाच) इतका अचूक वापर केला आहे. बॅकग्राऊंड स्कोअर पण हटके आणि मजा आणणारा आहे. काही प्रसंग ही चांगलेच जमले आहेत, विशेषतः अमेय वाघचे. चित्रपटाचा वेग जास्त असल्याने कंटाळा येत नाही हे पण तितकंच खरं.
सिनेमॅटोग्राफी मध्ये केलेला नवीन प्रयत्न मात्र अगदी मस्त जमून आलाय. देव डी(एक नवीन प्रयत्न म्हणून) ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. चित्रपटातील गाणी सुद्धा मस्त धमाल आणतात.
कलाकारांचा अभिनय पण चोख झालाय. पण पात्रांच्या लिखाणातील उथळता मात्र जाणवत राहते. अमेय वाघ आणि सक्षम कुलकर्णीने जाम धिंगाणा घातलाय. आरोह वेलणकर, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम यांची सुद्धा कामे चांगली झाली आहेत.
चित्रपटाचा शेवट मात्र तद्दन हिंदी चित्रपटांसारखा(वैयक्तिक मला न आवडणारा) सगळ्या गोतावळ्याला एकत्र आणून, धुडगूस घालून होतो.
एकुणात काय? तसा हा पहिला-वहिला मराठीतला प्रयत्न आणि त्यात हे दिग्गज कलाकार म्हणूनचं काय ते अप्रूप !
बाकी क्राईम कॉमेडी पाहायची लहरचं आली असेल तर पल्प फिक्शन किंवा दिल्ली बेल्लीचं पुन्हा एन्जॉय करा.
- आशुतोष

 :)


Comments

Popular Posts