मिर्झया
हिर रान्झा, सोहनी महिवाल आणि मिर्झा साहिबान या पंजाबमधील तीन प्रसिद्ध लोककथा किंबहुना शोकांतिकाच.
'साहिबाने तीर क्यूँ तोडे ?' या प्रश्नाच्या उत्तरासाठी सुरु झालेला राकेश ओमप्रकाश मेहरांचा, मिर्झा साहिबान सोबतचा प्रवास 'मिर्झया' या चित्रपटासोबतच संपतो.
ऑन पेपर, अतिशय सशक्त असलेला हा चित्रपट पडद्यावर तितका सक्षम राहत नाही, हीच खरी मिर्झयाची शोकांतिका.
सशक्त म्हणजे बघा... राकेश ओमप्रकाश मेहरांचे दिग्दर्शन, शंकर एहसान लॉय यांचं संगीत, पी. एस. भारती यांचं एडिटींग आणि हे सारं कमी की काय म्हणून गुलजार यांची पटकथा आणि गीत लेखन !
दिल्ली ६, रंग दे बसंती आणि भाग मिल्खा भाग मध्ये जी पद्धत राकेश ओमप्रकाश मेहरांनी वापरली, त्याच पद्धतीने ते दोन कथांचा, दोन भिन्न कालखंडाचा मिलाफ घालत मिर्झा आणि साहिबान यांची कथा पुढे नेतात. पण त्यांना या वेळी दुर्दैवाने कथांचा सुवर्णमध्य सापडत नाही हेच खरे.
दोन कथा एकमेकांना समांतर जाण्याऐवजी आलटून-पालटून घडत राहतात आणि त्यामुळेच त्यातील औत्सुक्य संपून जाते.
मिर्झा आणि साहिबानची कथा ही बर्फाच्छादित आणि काहीशा आभासी प्रतालावर चित्रीत केलेली आहे. आणि मग त्यालाच समांतर अशी आजच्या काळातील आदिल आणि सुचित्रा यांची कथा राजस्थान मध्ये घडत राहते.
मूळ पंजाब मध्ये घडणारी कथा चित्रपटामध्ये राजस्थान मध्ये दाखवली आहे. त्यामुळे तेथील भव्य राजवाडे, घराणेशाही, वाळवंटे, राजस्थानी कलासंस्कृती हे सारे ओघानेच कथेमध्ये येते.
अभिनयाच्या बाबतीत हर्षवर्धन कपूर आणि सय्यमी खेर मात्र काही छाप पडू शकत नाहीत. हर्षवर्धन कपूरने घोडेस्वारी मध्ये जेवढी मेहनत घेतली आहे, तेवढी जर अभिनयात घेतली असती तर वेगळीच मजा आली असती. बाकी सहाय्यक कलाकारांची कामे चांगली झाली आहेत.
पण तरीही...
पडद्यावरील नेत्रदीपक दृश्य पाहत राहावीत, समृद्ध संगीताचा आस्वाद घ्यावा, गुलजार यांच्या शब्दांचे अर्थ शोधण्यात हरवून जावं, असा स्वप्नवत अनुभव मात्र मिर्झया पाहताना येतो हे नक्की !
पावेल डायलस याची सिनेमॅटोग्राफी केवळ नेत्रदीपक ! राजस्थान मधील लोकनृत्ये, रंगाची होणारी बेधुंद उधळण आणि त्या बर्फाच्छादित प्रदेशातील हृदयाचा ठोका चुकवणारे नाट्य हे केवळ पडद्यावर अनुभवण्यासारखेच.
शंकर एहसान लॉय यांचं पंजाब-राजस्थानी संगीताचा मिलाफ केलेलं श्रीमंत संगीत आणि तितक्याच ताकदीचा बॅकग्राऊंड स्कोअर यामुळे मिर्झया वेगळ्याच पातळीवर पोहोचतो.
गुलजार साहेबांच्याबद्दल मी बोलणे चुकीचेच ठरेल म्हणा...
एकूणच काय...मिर्झया हा कथा, कथेची मांडणी आणि अभिनयामध्ये कमकुवत असणारा पण समृद्ध संगीताने आणि गुलजार यांच्या शब्दांनी नटलेला, नयनरम्य सोहळा आहे !
-आशुतोष :)


Comments

Popular Posts